एक धाडसी महिला पोलीस अधिकारी ज्यांच्या कहाणीची दखल १०वीच्या पुस्तकात घेतली गेलीय
अनेकदा घरातील वाईट परिस्थितीमुळे किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलं घरातून पळून मोठ्या शहरात जातात. ह्यात मुंबईत येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त, मुंबईला म्हणतातही स्वप्नांचं शहर. परंतु ह्यात अनेक मुलं हरवतात तर काही चुकीच्या मार्गाला लागतात. १० ते १६ वय वर्ष असेलल्या मुलांची संख्या ह्यात जास्त दिसून आली आहे.
अश्या घरातून पळून आलेल्या, हरवलेल्या जवळपास ९०० पेक्षा जास्त मुलांना मुंबईतील पोलीस अधिकारी रेखा मिश्रा ह्यांनी त्यांच्या घरी आई वडिलांकडे पोहोचवले आहे. असे धाडसी काम करणाऱ्या मध्य रेल्वेच्या PSI रेखा मिश्रा यांच्या कामाची दखल १०वीच्या पुस्तकात घेतली गेली आहे. जाणून घेऊया त्यांची कहाणी.
रेखा मिश्रा म्हणतात, माझे वडील आर्मीत होते आणि त्यांच्या पासून प्रेरित होऊन मी पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी मी पास झाले त्या दिवशी वडिलांनी मला सॅल्यूट केला आणि म्हणाले ‘नेहमी लोकांना मदत करण्याच्या हेतूने काम करा नाकी केवळ आपलं नाव करण्यासाठी’
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहिली पोस्टिंग
रेखा मिश्रा यांची पहिली पोस्टिंग CST (छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) इथे झालेली. त्यांच्यावर लहान मुलं व महिलांची तस्करी रोखण्याची जबाबदारी देण्यात आली.
एका रात्री ११ वर्षाचं मुलं ट्रेन मध्ये लपून बसलेलं मिश्रा यांना दिसलं. वडिलांनी मारल्यामुळे घाबरून हे मुलं घरातून पळून आलेलं. रेखा मिश्रा ह्यांनी मुलाच्या आईचा शोध घेऊन त्या मुलाला सुखरूप त्याच्या आईकडे सुपूर्द केलं.
एकावेळी तर एक ४५ वर्षीय मनुष्य १५ वर्षाच्या मुलीला घेऊन पळून जायच्या बेतात होता. ३ दिवसांपासून ते फरार होते. गोआ पोलिसांकडून PSI रेखा मिश्रा ह्यांना हि माहिती मिळाली आणि त्यांच्या टीमच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने ह्या मनुष्याला पकडले. त्या १५ वर्षीय मुलीला सोडवल्यानंतर तिने रडत रेखा ह्यांना मिठी मारली आणि तिला सोडवल्याबद्दल आभार मानले.
२०१५ पासून जवळपास ९५० मुलांना सोडवण्याचे काम रेखा मिश्रा ह्यांनी केले आहे. रेखा ह्यांच्या कामाची दखल राष्ट्रपतींनी सुद्धा घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या कामाचा दाखला घेत रेखा मिश्रा ह्यांच्यावर आधारित एक धडा कुमार भारतीच्या १०वीच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे.