MPSC परीक्षेचे स्वरूप बदलणार
MPSC Pattern Chnage – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) घेण्यात येणाऱ्या वर्ग एक आणि दोन श्रेणीच्या परीक्षेच्या स्वरूपात सुधारणा सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या चंद्रकांत दळवी समितीने आपला अहवाल लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर (Kishorraje Nimbalkar) यांच्याकडे आज दिला.
राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मुख्यत्वाने वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकारी दर्जाच्या पदांचा समावेश असतो. या परीक्षांची पूर्व परीक्षा त्याचा अभ्यासक्रम आणि एकूण स्वरूप तसेच मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि त्यासाठीचा अभ्यासक्रम कसा असावा, या संदर्भात विचार करून अभ्यास करून शिफारशी सादर करण्यासाठी माजी निवृत्त ‘आयएएस’ अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने समिती नेमली होती. या समितीत राज्याचे निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तसेच भारतीय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस.एफ. पाटील यांचा समावेश होता.
राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी राज्यभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात. विविध अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आधिकारी होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.या पाश्र्वभूमीवर आयोगाची परीक्षा पद्धती अधिक योग्य व्हावी यासाठी शिफारशी सुचविण्यासाठी दळवी यांची समिती नेमण्यात आली होती.
लोकसेवा आयोगाच्या सध्याच्या परीक्षेचे स्वरूप, त्यातल्या अडचणी आणि भविष्याचा वेध घेत परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम कसा असावा याचा विचार चंद्रकांत दळवी यांच्या समितीने केला आहे. समितीमध्ये दळवी यांच्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तसेच भारती अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस. एफ. पाटील तसेच निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांनी अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे.
काय बदल होणार?
MPSC Pattern Chnage – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी किमान ३३% गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात येत आहे. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
CSAT बद्दलचा निर्णय सोडून सध्या इतर कोणतेही बदल आयोगाने केलेले नाहीत. म्हणजेच मुख्य परीक्षेत बदल होणार ही जी चर्चा चालू होती त्यास सध्या तरी पूर्णविराम आहे.