तुमचीही भावना हीच आहे का? कुणाचं ही करा भलं तरी कुणीच नाही आपलं…
माझ्या भावना कुणालाच कलात नाहीत. कुणाच्याही वेळेला उपयोगी पडा. अडीअडचणीला धावून जा परंतु आपल्या वेळी कधीच कुणी येत नाही. इतकंच काय सोशल मिडियावरही काही टाकत राहीलं तरी लक्ष कुणीच देत नाही. तोंडदेखलं बोलतात तसं व्हॉट्सॲप असो की फेसबुक अंगठे वर करण्याचं बटण क्लिक करतात. पण चार चांगले शब्द कुणी काढत नाही. आपल्यालाच असं का करतात? असं कुणी बोललं किंवा आपल्याच भावना असतील तर नवल वाटण्याजोगं यांत काही नाही. नात्यातले मोठे किंवा ऑफिसातले वरिष्ठ काहींच्याच गोष्टींचं कौतुक करत असतील तर त्याबद्दल आणि आपल्याबद्दल काहीच न बोलल्याबद्दल आपल्याला वाईट वाटतं. आपलं वरचेवर कौतुक व्हावं अशीच आपली इच्छा झालीय का? काय कारण असं वाटण्याचं?
सध्याच्या काळात आपल्याला स्मार्ट फोन सहज उपलब्ध झाला आहे. स्मार्ट फोनमध्ये फेसबुक, ट्विटर सारखी अॅप्स आहेत. आपण जे वाटेल ते या अ ॅप्स वर पोस्ट करून आपले विचार, मतं, भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याकडे कुणाचंही लक्ष नाही. आपण आपल्या मनातलं कुणाला सांगावं हा प्रश्नच आपल्याला पडतो. घरातल्या आणि बाहेरच्या अशा कोणीच व्यक्ती माझं म्हणणं ऐकायला मोकळ्या नाहीत. असे विचार सतत मनात घोळत असतात.
कसं शोधावं या प्रश्नाचं उत्तर?
१. आधी महत्त्व घरच्यांना द्या. घरच्यांकडेच आपलं मन मोकळं करायला हवं.
२. अन्य लोकांनाही समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते तुम्हाला समजून घेतील.
३. लहान सहान बाबींमध्ये इतरांसोबत स्वतःला तोलू नकात.
४. आपलं मन कशामुळे आनंदी होतं याचा शोध घेऊन तेच करावं.
५. दिखाऊपणा पेक्षा आत्मिक समाधान मिळवण्यासाठी गोष्टी कराव्यात.
६. जे वाटेल ते मनात न ठेवता बिनधास्त बोलावं.