जल जीवन मिशन (JJM)
चर्चेत का आहे?
ऑक्टोबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन (JJM) मोबाईल अॅप्लिकेशनचे अनावरण केले.
मिशनबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि JJM अंतर्गत योजनांची पारदर्शकता आणि जबाबदारी सुधारणे या उद्देशाने हे अॅप विकसित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय जल जीवन कोश – यासोबतच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जल जीवन कोशही सुरू केला. हा कोश कोणत्याही व्यक्ती, संस्था, महामंडळ किंवा परोपकारी व्यक्तींना नळपाणी जोडणी देण्यासाठी योगदान देण्यास मदत करेल.
काय आहे जल जीवन मिशन ?
सुरुवात – १५ ऑगस्ट २०१९
संबंधित मंत्रालय – जल शक्ती मंत्रालय
प्रमुख उद्दिष्ट – २०२४ पर्यंत कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे (Functional House Tap Connections- FHTC) प्रत्येक ग्रामीण घराला प्रतिदिन दरडोई ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवणे.
विशेष भर – स्थानिक पातळीवर पाण्याची एकात्मिक मागणी आणि पुरवठा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे.
निधी – ९०:१० (केंद्र-हिमालयीन आणि पूर्वोत्तर राज्य), ५०:५० (केंद्र-इतर राज्य), १००:० (केंद्र-कें. प्रदेश)
ही मोहीम विद्यमान पाणीपुरवठा यंत्रणा आणि नळ जोडणीची कार्यक्षमता सुनिश्चित करते; पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याबरोबरच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देते.
ही मोहीम पाण्याच्या सामुदायिक दृष्टिकोनावर आधारित आहे.
मोहिमेचे मुख्य घटक म्हणून व्यापक माहिती, शिक्षण आणि संप्रेषण यांचा समावेश आहे.
मिशनसाठी चार स्तरीय संस्थात्मक यंत्रणा –
1. राष्ट्रीय जल जीवन मिशन (राष्ट्रीय स्तरावर)
2. राज्य पाणी व स्वच्छता मिशन (राज्य स्तरावर)
3. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (जिल्हा स्तरावर)
4. 4. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती (ग्राम पातळीवर)
आत्तापर्यंत झालेली प्रगती –
जेव्हा ही मोहीम सुरू करण्यात आली, तेव्हा देशातील एकूण ग्रामीण घरांपैकी फक्त १७% (३२.३ दशलक्ष) लोकांना नळाचे पाणी उपलब्ध होते. सध्या सुमारे ७.८० कोटी (४१.१४%) घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा होतो.
गोवा, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार बेटे, पुदुचेरी यांनी ग्रामीण भागांत १००% घरगुती नळ जोडणीचे लक्ष्य गाठले आहे आणि ‘हर घर जल‘ सुनिश्चित करणारी राज्ये बनली आहेत.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाणी देऊन गोवा हे देशातील पहिले ‘हर घर जल राज्य’ बनले आहे.
[जल जीवन मिशन-ग्रामीणला पूरक म्हणून २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशन-शहरीची घोषणा करण्यात आली आहे.]