एकाच कुटुंबातील IAS-IPS झालेल्या ४ बहीण भावांची प्रेरणादायी गोष्ट
UPSC परीक्षा पास होऊन प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचं लाखो मुलांचं स्वप्नं असतं. परंतु आपलं स्वप्नं पूर्ण करण्यात काही मोजकेच जण पात्र ठरतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि एकाच कुटुंबातील ४ बहीण भाऊ UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS-IPS झाले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का ?
हि गोष्ट आहे उत्तर प्रदेश मधील प्रतापगढ़ जिल्ह्यात राहणाऱ्या मिश्रा कुटुंबाची. ह्या कुटूंबातील चौघे म्हणजेच २ भाऊ आणि २ बहिणी UPSC उत्तीर्ण झाल्यात आणि तेही केवळ ३ वर्षांच्या कालावधीत. मिश्रा कुटुंबातील ह्या ४ भावंडांची नांव योगेश, लोकेश, क्षमा आणि माधवी अशी आहेत. जाणून घेऊया मिश्रा भावंडांची प्रेरणादायी कहाणी.
या ४ भावंडांचे वडील अनिल मिश्रा ग्रामीण बँकेत मॅनेजर होते. २ खोल्यांच्या घरात या ६ जणांनी आपलं आयुष्य काढलं. आर्थिक परिस्थिती साधारण असली तरी आपल्या मुलांच्या सगळ्या हौस त्यांनी पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न केला. आपल्या मुलांनी मिश्रा परिवाराचं मोठं नाव कमवावं हे त्यांचं स्वप्नं.
योगेश आणि लोकेश दोघांनी आपले B.Tech पूर्ण केले आणि खाजगी कंपनीत नोकरी करायला सुरवात केली. दुसरीकडे क्षमा आणि माधवी ह्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. योगेश आणि लोकेश यांना मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी होती परंतु त्यात ते समाधानी नव्हते, त्यांना काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती.
बरीच मेहनत केल्यानंतरही UPSC च्या परीक्षेत पास न झाल्याने दोघी बहिणी खचल्या होत्या. त्यांच्याकडे बघून योगेश मिश्रा यांनी आपली नोकरी सोडली आणि UPSC च्या परीक्षेची तयारी सुरु केली. आपण प्रशासकीय अधिकारी होऊन बहिणींना मार्गदर्शन करू असे त्यांनी ठरवले. त्यांच्यापाठोपाठ लोकेश मिश्रा ह्या लहान भावानेही UPSC ची तयारी सुरु केली.
दोन्ही मुलांनी अचानक नोकरी सोडल्याने मिश्रा परिवारावर थोडं आर्थिक संकट ओढावलं होतं. २ वर्ष मिश्रा कुटुंबाला बऱ्याच कठीण काळातून जावं लागलं. चारही भावंडं प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी मोठी मेहनत घेत होते. क्षमा आणि माधवी मिश्रा ह्या दोघींनी काही सरकारी परीक्षा पास केल्या परंतु त्यांचं ध्येय IAS बनण्याचं होतं.
ते म्हणतात ना कठीण काळानंतर सुगीचे दिवस येतातच. २-३ वर्ष अनेक अडचणींचा सामना केल्यांनतर २०१४ साली योगेश मिश्रा ह्यांची UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांचं IAS बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्या पाठोपाठ २०१५ साली माधवी मिश्रा ह्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि झारखंड कॅड्रेमध्ये त्यांची नियुक्ती झाले. २०१६ साली लोकेश आणि क्षमा मिश्रा ह्यांची IAS आणि IPS साठी निवड झाली.
केवळ ३ वर्षांच्या कालावधीत एकाच कुटुंबातील ४ भावंडांनी UPSC उत्तीर्ण करून देशातील सर्व विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.